अध्याय १ : अर्जुनविषाद योग
अठरा अक्षौहिणी सैन्य हे संगरी जमले असता ।
संजय वदतो धृतराष्ट्राला युद्धभूमीची वार्ता ।। १।।
कुरुक्षेत्रीच्या मध्यवरती वीर धनंजय जाता ।
संमोहित तो होई बघुनी स्वजना आणि आप्ता ।।२।।
म्हणे केशवा उचले ना मज गांडिव धनु हे आता ।
कसे चालवू शर मी माझे साहे न मम चित्ता ।। ३।।
भीष्म पितामह द्रोण कृपाळू सामोरी मज दिसता ।
खांद्यावरती रमलो त्यांच्या विसरू कशी महत्ता ।।४।।
श्वशुर कुणी कुणी हे भाचे बंधू कुणी कुणी चुलता ।
कसे चालवू शस्त्र अस्त्र मी समोर असता भ्राता ।।५।।
मरणाअधीन होऊन सैनिक धारातीर्थी पडता ।
अश्रूंना मी कारण होईन शापातील त्या माता ।।६।।
नकोच कीर्ती यश हे मजला नकोच पापी सत्ता ।
मारुनि बांधव वडील जनांना काय अर्थ या वित्ता ।।७।।
जरी दुष्ट तो असेल शत्रू आततायी सर्वार्था ।
मारुनि त्यांना घेईन मी ते पापच माझ्या माथा ।।८।।
कुलानाशी हे कृत्यच अन मी झालो त्यांचा कर्ता ।
नरकाचा मी होईन भागी कोण उरे मज त्राता ।।९।।
अनर्थ घडतो त्यांच्या देशा कुलनाशी निपजता ।
संकर होतो वर्णांचा अन स्त्रिया होति पतिता ।।१०।।
म्हणुनी माधवा प्राणही नसती प्रिय हे मजला आता ।
वदुनि एवढे बसे धनंजय त्यागुनी धनु अन भाता ।। ११।।
राजेंद्र (?) २८ मार्च १९९९